स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे ( कालठण ) दि . ३ १ :
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला असून, अवघी कालठण नगरी भक्तीच्या चैतन्याने उजळून निघाली आहे. चैत्र पौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी गावात उत्साहाचे वातावरण असून, मुख्य यात्रेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
ग्रामस्थांचे आगमन आणि पाहुण्यांची मांदियाळी
विशेष म्हणजे, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेरगावी, मुंबई-पुण्यासारख्या शहरात आणि चक्क परदेशात स्थायिक झालेले ग्रामस्थ आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी सहकुटुंब सहपरिवार गावात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गावातील घराघरांत पाहुण्या-रावळ्यांचे आगमन होत असून, हा केवळ धार्मिक उत्सव न राहता एक भव्य कौटुंबिक स्नेहसोहळा बनला आहे.
मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई
यात्रेनिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिरावर अतिशय आकर्षक आणि डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी झगमगत्या दिव्यांच्या माळांनी मंदिर परिसर उजळून निघत असून, हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची आतापासूनच गर्दी होत आहे.
असा रंगणार यात्रेचा मुख्य सोहळा:
-
- १ एप्रिल (हनुमान जन्मोत्सव): रात्री हनुमान मंदिरात ‘हरि जागर’ होईल. सूर्योदयाच्या वेळी हनुमान मूर्तीवर गुलाल-पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला जाईल.
- २ एप्रिल (मुख्य यात्रा दिवस):
- पहाटे: देवास दंडवत घातले जातील. सकाळी अंबील व देवांच्या कावड काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक निघेल.
- रात्री ८ वाजता: श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी देवीला ‘मानाचा पोशाख’ चढवण्यात येईल.
- रात्री ८ नंतर: देवाला ‘शेरण्या’ अर्पण करण्याचा विधी पार पडेल आणि त्यानंतर भाविकांना श्रींच्या मूर्तींचे विलोभनीय दर्शन घेता येईल.
- मध्यरात्री १२: भव्य ‘छबिना’ मिरवणुकीला प्रारंभ होईल. ढोल-ताशा, हलगी आणि सनई-पिपाणीच्या तालावर भक्तगण थिरकणार असून, छबिन्यासमोर तोफांची सलामी आणि आकर्षक शोभेचे दारूकाम मुख्य आकर्षण ठरेल.
- ३ एप्रिल: सकाळी ८ वाजता वाजंत्री हजेऱ्या आणि सायंकाळी ४ वाजता मल्लविद्येचा थरार असणारे ‘भव्य कुस्त्यांचे मैदान’ रंगणार आहे.
- ४ एप्रिल: सकाळी यात्रेचा वार्षिक हिशोब मांडून सोहळ्याची सांगता होईल.
गुलालाच्या उधळणीने कालठण न्हाणार:
“यंदाच्या यात्रेत तोफांची सलामी, गुलालाची उधळण आणि रात्रीच्या वेळी होणारे मूर्तींचे दर्शन ऐतिहासिक असणार आहे. काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीच्या छबिन्याचे नयनरम्य रूप हजारो डोळ्यांचे पारणे फेडेल,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे