स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . १८ / ४ / २०२४ ) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून त्यांना विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारामतीचा खासदार त्यांच्याच विचाराचा हवा. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करा असे भावनिक आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
इंदापूर येथील आय एम ए च्या नी. तू. मांडके सभागृहात आयोजित डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी इंदापूर आयएमए च्या अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे, सचिव डॉ. प्रतिभा वणवे व सहकाऱ्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे मामा, आमदार यशवंततात्या माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, डॉ. शशिकांत तरंगे, आय एमए चे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राम आरणकर, डॉ. संजय हेगडे, डॉ. संजय शहा, डॉ. उदय अजोतीकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. दत्ता गार्डे, डॉ. समीर मगर, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. नामदेव गार्डे, डॉ. बाळासाहेब राऊत, डॉ. अनिल शिर्के, डॉ. महेश रूपनवर, डॉ. निखिल धापटे, श्रीमंत ढोले, वर्धमान शहा, निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. कमलाकर व्हरकाटे, सचिव डॉ. समीर मुलाणी, डॉ. पंकज गोरे, डॉ. उदय कुरुडकर, होमिओपॅथिक संघटनेचे संस्थापक तालुकाध्यक्ष डॉ. संदेश शहा, विद्यमान अध्यक्ष डॉ. सूर्यकांत बनसोडे, डॉ. निलेश कुंभार, डॉ. संदीप गार्डी उपस्थित होते. यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी डॉक्टरांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. नंदकुमार गुजर, मेघश्याम पाटील यांनी व्यापारी तर विधीज्ञ मनोहर चौधरी व सहकारी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वकिलांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी अजित पवार यांनी डॉक्टर्स, व्यापारी व वकील संघटनेचे सर्व प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडविले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
अजितदादा पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अष्टपैलू कार्यक्षम व्यक्तिमत्त्व असून त्यांचे नेतृत्व जागतिक स्तरावर मान्य झाले आहे. त्यांच्यामुळे देशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले असून आपला देश जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनू पहात आहे. आपले आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम मंदिर त्यांच्याच प्रयत्नामुळे झाले आहे.
त्यामुळे त्यांचे नेतृत्व वाढविण्यासाठी त्यांच्या विचारांचे महायुतीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात कोणताही निधी आणला नाही याउलट केंद्र सरकारच्या सर्व योजनांना विरोध केल्यामुळे आपण विकासाच्या बाबतीत मागे पडलो आहे. देशात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या सक्षम उमेदवार आहेत. त्यांना तुम्ही संधी दिल्यास त्या सक्षमतेने संसदेत तुमचे प्रश्न निश्चित मांडतील. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. अविनाश पाणबुडे यांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, गर्भ लिंग निदान कायदा, डॉक्टरां वर होणारे हल्ले, बायो मेडिकल वेस्ट आदी कायद्या संदर्भातील जाचक अटी कडे सर्वांचे लक्ष वेधले. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर असून या मार्गावर सर्व सुविधांसह आधुनिक ट्रॉमा, न्युरो ट्रॉमा हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. आम्ही सर्व डॉक्टर्स मिळून इंदापूर येथे सुसज्ज मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटल उभा करत आहे, त्यास आपण मदत करावी असे आवाहन केले होते. यासंदर्भात बोलताना अजितदादा पवार म्हणाले, डॉ. कल्पना, डॉ. प्रतिभा या बीड जिल्ह्यातून इंदापूर येथे सून म्हणून आल्या आहेत, त्यांच्या बीड जिल्ह्यात काय होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र वैद्यकीय डॉक्टरांचे विविध प्रश्न सोडविण्या साठी आरोग्य सचिव, आयुक्त स्तरावर बैठक घेवून सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. मात्र डॉक्टरांनी विविध प्रश्नांची टिपण्णी तयार करून मला द्यावी, ती बैठकीत घेवून यावी असे आवाहन त्यांनी केले. इंदापूर तालुक्यात सूनां ना सन्मानाची वागणूक देण्यात येत आहे मात्र बारामतीत सुनांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची उपरोधिक टीका त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
प्रास्ताविक इंदापूर आय एम ए च्या अध्यक्षा डॉ. कल्पना मिलिंद खाडे यांनी तर सूत्रसंचलन डॉ. अतुल वणवे यांनी केले.
चौकट १) : इंदापूर येथील व्यापारी बैठकीत कुगाव करमाळा ते शिरसोडी इंदापूर असा भीमा नदीवर पूल उभारण्या साठी मागणी केली, त्याची दखल घेवून आपण सचिवांना लगेच त्याचा प्लॅन करण्यास सांगितले. ३८२ कोटी रुपयांचा आराखडा देखील मंजूर केला मात्र ज्यांच्यामुळे हा पूल उभा केला, त्यांनी राजकारणात दुसरा मार्ग निवडला अशी खंत अजितदादा यांनी भरत शहा यांचे नाव न घेता व्यक्त केली.
२) राज्यात काही भागात एक हजार मुलांमध्ये मुलींचे प्रमाण ८९० ते ८५० पर्यंत आहे. त्यामुळे मुला मुलींचे लग्न होण्यासाठी अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात महाभारतातील द्रौपदी प्रमाणे स्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे म्हणत अजित पवार यांनी भविष्यातील संकट अधोरेखित केले. आपला यामध्ये मजा करायचा उद्देश नव्हता असे म्हणत दादांनी सर्वांना हाथ जोडले. दादांच्या या मिश्किली मुळे उपस्थित डॉक्टरांनी टाळ्यांच्या गजरात या गंभीर प्रश्नाचे स्वागत केले.
३ ) राज्यात माझ्याकडे सहा लाख हजार कोटी रुपयांचे बजेट आहे पैकी कुगाव ते शिरसोडी या उजनी धरण जलाशयावर ३८२ कोटी रुपयांचा आराखडा तातडीने तयार केला. त्यामुळे तुम्ही निधीची काळजी करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्याचे सरकार आपलेच आहे. त्यामुळे कुठेही निधीची कमी पडणार नाही. मात्र तुम्ही सुनेत्रा पवार यांना निवडून देण्यासाठी कचा कचा बटण दाबा, तुम्हाला हवा तेव्हढा निधी दिला जाईल असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थित मान्यवरांमध्ये जोरदार हशा पिकला.