निरा- भिमा कारखान्याच्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार – लालासाहेब पवार.(चेअरमन निरा-भिमा कारखाना)
– कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज
स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १६ / १० / २०२३ ):
:-
नीरा भीमा कारखाना आगामी सन 2023-24 च्या गळीत हंगामासाठी सर्व तयारीनीशी सुसज्ज झालेला असताना, शेतकऱ्यांची दिशाभूल व्हावी म्हणून खरी वस्तुस्थिती लक्षात न घेता कारखान्याच्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. संबंधित बँकेच्या कर्ज परतफेडी संदर्भात यापूर्वीच तडजोडीने मार्ग निघाला आहे. दरम्यानच्या काळात संबंधित बँकेने कामकाजाचा भाग म्हणून कारखान्यास दिलेल्या नोटीशीचा विषय आता मार्गी लागला आहे, अशी माहिती नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली.
नीरा भीमा कारखान्याने संबंधित बँकेचे यापूर्वी एकूण 6 ते 7 वेळा कर्ज घेऊन नियमित परतफेड केली आहे. संबंधित बँकेकडून कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदान देणे, बेसल डोस व ऊस विकास योजनांसाठी रु. 20 कोटी चे कर्ज घेतले. मात्र काही अडचणींमुळे परतफेडीस उशीर झाल्याने संबंधित बँकेने अवाजवी दंड व व्याजाचे आकारणी केल्याने त्या विरोधात कारखाना हा शेतकरी हितासाठी डी.आर.टी. मध्ये अपिलात गेला. संबंधित बँकेबरोबर या संदर्भात बैठका होऊन तडजोडीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. बँकेने 18 महिन्याचा कर्ज परफेडीचा प्रस्ताव दिला असून, आम्ही त्यांना 36 महिन्याची मुदत मागितली.
दरम्यानच्या काळात सदर बँकेकडून कर्जा संदर्भात राज्यातील अनेकांना दिलेल्या नोटीशीच्या यादीमध्ये कारखान्याचे नाव आले. मात्र हा विषय आता तडजोडीने मार्गी लागला आहे. बँकांच्या कर्ज वसुलीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अशा नोटीसा येत असतात, सध्या राज्यातील अनेक कारखान्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे संबंधितांनी खरी वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे, मात्र राजकीय हेतूने शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही जण सध्या करीत आहेत, संबंधितांनी असा अपप्रचार थांबवावा, असे लालासाहेब पवार यांनी नमूद केले. नीरा भीमा कारखान्याच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्यांचे कारखान्याच्या उभारणीत योगदान काय आहे. ज्यांनी एकाही सहकारी संस्थेची उभारणी केली नाही, अशांनी इतरांनी कष्टाने उभा केलेल्या व हजारो शेतकरी- कर्मचाऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहेत अशा कारखान्या संदर्भात चिंता करायची गरज नाही, असे ते म्हणाले.
निरा भिमा कारखाना गेली 23 वर्षे सक्षमपणे चालु असून, कारखाना अडचणीतून बाहेर पडत आहे. निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी, कर्मचारी व इतर संबंधित घटकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या विकासामध्ये कारखान्याचे गेली 23 वर्ष मोठे योगदान आहे. कारखान्याकडून लवकरच मागील गळीत हंगमासाठी ऊस बिलाचा प्रति टन रु. 200 प्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. गेली पाच-सहा महिन्यापासून ठराविक व्यक्ती कारखान्याच्या विरोधात जाणीवपूर्वक सतत बदनामीचा प्रयत्न करीत आहेत.
तसेच सदरच्या व्यक्तीं निरा भिमा कारखान्याच्या विरोधात इतर कारखान्यांच्या शेतकी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन इतर कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे निरा भिमा कारखान्याच्या हिताच्या विरोधात राजकीय द्वेषापोटी भूमिका घेणाऱ्यांनी कारखान्याच्या विरोधातील जाणीवपूर्वक अपप्रचार थांबवावा. आगामी गळीत हंगामात ऊसाची कमतरता असल्याने कारखान्यांच्या दृष्टीने आगामी गळीत हंगाम हा आव्हानात्मक असा आहे. तरीही शेतकरी, सभासद, हितचिंतक यांच्या सहकार्याने निरा भिमा कारखान्याचा आगामी गळीत हंगाम निश्चितपणे यशस्वी होईल, असेही यावेळी लालासाहेब पवार यांनी स्पष्ट केले.